जाने कहां गये वो दिन || भाग दूसरा || हरवलेलं पत्र || लेखिका नीलिमा क्षत्रिय
ऐंशीच्या दशकापर्यंत पत्र हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. बायका दुपारच्या वेळी घरातली काम उरकून पायरीवर, ओट्यावर शेजारणी जमवून बसलेल्या असायच्या. शिळोप्याच्या गप्पा चाललेल्या असतानाच गल्लीच्या कोप-यावरून पोस्टमन सायकलवरून येताना दिसायचा. खाकी डगला, खाकी टोपी घातलेला पोस्टमन म्हणजे आनंदाची फुले वाटणारं एक चालतं बोलतं झाडच असायचं. सगळ्या उत्सुकतेनं त्याची वाटचाल निरखायला लागायच्या. कोणाकडे थांबतो..कोणाकडे थांबतो.. आणि कोणाची तरी लॉटरी लागायची. एखादीच्या दारापुढे पोस्टमन थांबून एखाद्या नावाचा पुकारा करायचा की गप्पा मारणारी हरखून जायची आणि लगबगीने घराकडे जात पत्र ताब्यात घ्यायची. गावाकडचं पत्र, माहेरचं पत्र.. कुठलंही असलं तरी त्या निर्जिव दहा पैशाच्या पोस्टकार्डात जिव्हाळा असायचा, ममता असायची. स.न.वि.वि. अशा मायन्याने सुरू होणारी पत्रे 'कळावे लोभ असावा' ह्या वाक्याने संपायची. दोन वाक्यांच्या मधल्या जागेत मायेचं आभाळ दाटलेलं असायचं. आपुलकीचा दरवळ असायचा. पत्र घेणारी मग पोस्टमनला पाणी वगैरे विचारायची. तो पण सायकलवरून पायउतार होऊन जरा ओट्यावर टेकायचा. पाणी पिता पिता पत्राची, घरातल्यांची चौकशी करायचा. कधी दु:खाच्या बातम्या द्यायचं अवघड कामही त्याला करावं लागायचं. वेळप्रसंगी एखाद्या निरक्षर घरात पत्र वाचून दाखववावं लागायचं, तसं दोन ओळींची खुशाली देणारं कार्ड खरडूनही द्यावं लागायचं. कधी ह्या पत्रांमध्ये गुलाबी लिफाफ्यातली सेंटेड प्रेमपत्रं असायची कधी मृत्युची बातमी देणारी अर्धीच लिहिलेली पोस्टकार्डेही असायची. संक्रांतीच्या आसपास पाकिटातनं चार दाणे तिळगूळ ही पोहोचायचे.
#marathilekhika
#marathi
#kathakathanmarathi
#marathikathakathan
#नीलिमाक्षत्रिय
#nilimakshatriya
#कथाकथन
#storytelling
story telling
storytelling