देवगड आणि मालवण या दोन तालुक्यांच्या सीमेवर मुणगे गाव वसले आहे. देवगडपासून 30 किमी.
आणि कुणकेश्वरपासून 16 किमी. अंतरावर मुणगे गाव आहे. प्राचीन काळी या गावात ऋषीमुनीचे वास्तव्य होते म्हणून या गावाला मुनीग्राम असे म्हटले जायचे. कालांतराने मुनीग्रामचे अपभ्रंश होऊन मुणगे असे नाव रुढ झाले. या गावची ग्रामदेवता देवी भगवती हे एक जागृत देवस्थान आहे. देवी भगवतीचा वरदहस्त या गावावर असल्याने हे गाव प्रसिद्धीस आले आहे. अगदी सागरी महामार्गाला लागूनच देवी भगवतीचे प्राचीन कौलारु देवालय आहे.
देवीच्या सध्याची पाषाणमूर्तीची १८१० मध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. काळ्या पाषाणात सुंदर रेखीव कोरीव काम केलेली महिषासूर मर्दीनीच्या रूपात ४ फूट उंचीची मूर्ती असून बाजूला चांदीच्या पत्र्याचा सुंदर नक्षीकाम केलेला महिरप आहे. मूर्तीच्या एका हातात खड्ग, दुस-या हातात त्रिशुल, तिस-या हातात ढाल व चौथ्या हातात शंख असून ती महिषासूरावर पाय ठेवून उभी आहे. गाभा-यात मूर्ती उंचावर असल्याने बाहेरूनही भाविकांना दर्शन घेता येते. मंदिराच्या गाभा-यात एक शिवलिंग व गाभा-याबाहेर संकेताचा पाषाण आहे. देवीची आज्ञा घेतेवेळी त्या पाषाणाचा उपयोग केला जातो. त्या पाषाणात देवतेचा अंश असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. तो पाषाण दहा किलो वजनाचा असून त्यास 'गुंडी' असे म्हटले जाते. सोलापूर परिसरात तशा पाषाणाला 'गुंडा' असे संबोधन आहे. त्या पाषाणाच्या साह्याने देवीच्या मंदिरात कौलप्रसाद घेण्याचे काम तसेच न्यायनिवाडे करण्याचे काम नित्यनियमाने सुरू असतात.
उत्सवकाळात देवीचं स्नान झाल्यावर सकाळी देवीस वस्रलंकारांनी व कवडय़ाच्या माळेनं सजववल्यावर विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर देवीचं दर्शन व ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. उत्तरेला असलेल्या गोमुख व शिवस्थानामुळे या देवीला ‘सोमसुत्री’ प्रदक्षिणा घालावा लागते. देवीची पालखीही तशीच फिरवली जाते.
देवीचे मंदिर प्रशस्त असून चार भागात विभागले आहे. मंदिराचं बांधकाम हेमांडपंथी असून गाभारा पुरातन पद्धतीप्रमाणे लाकडी गोलाकार खांबांवर कोरीव काम करून बांधण्यात आला आहे. दुस-या भागात आरती, पुराणे सांगितली जातात. तिस-या भागात पालखी ठेवतात तर चौथ्या भागात नृत्य, गोंधळ, कीर्तन- प्रवचन व अवसर काढणे आदी कार्यक्रम होतात. येथेच ग्रामसभा घेतली जाते. सभोवतालचा परिसर मजबूत दगडी चि-यांनी बांधून काढला आहे.
मंदीरातील बहुतांशी बांधकाम हे लाकडी असून अतीशय सुबक कोरीवकाम या लाकडी बांधकामावर केलेले आहे. मंदीराचा एकूण परिसरच शांत आणि रमणीय असा आहे. मंदीराच्या मागच्या बाजुला एक बारमाही पाण्याचा झरा असून. येथे हात-पाय धुवूनच देवीच्या दर्शनाला जावे लागते. या झय्रापासून थोड्या अंतरावर महापुरुषाचे जागृत स्थान आहे. मंदीर परिसरात देवी अनभवनी, देवी पावणी, देवी बायची, देवी भावय, ब्राह्मणदेव, देव गिरावळ, देव गांगो व देव गायगरब ई. देवतांची स्थाने आहेत.
देवीचे वार्षीक उत्सव मोठ्या दिमाखात साजरे केले जातात.
एका आख्यायिकेनुसार, भगवती देवी काशीहून मुणगे येथील ‘पाडावे’ कुटुंबियांच्या घरी वास्तव्याला आली होती म्हणून तिचे माहेर या गावातील पाडाव्यांच्या घरी आहे असे समजले जाते. त्यामुळे देवीची ओटी पाडावे यांच्याच घरी भरली जाते. उत्सव काळात, देवीचे स्नान झाल्यावर सकाळी देवीस वस्त्रालंकारांनी व कवड्यांच्या माळेने सजवतात व तिची विधिवत पूजा करतात. त्यानंतर देवीचे दर्शन व ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. देवी दर तीन वर्षांनी कारिवणे वाडीतील पाडावे यांच्या घरी माहेरपणाला येते. त्यास देवीची 'माहेरस्वारी' असे म्हणतात. देवी दुसऱ्या दिवशी पूजाअर्चा, महानैवेद्य झाल्यावर वाजत-गाजत पुन्हा मंदिराकडे निघते.
चैत्र महिन्यात देवीची एक महिना पालखी असते. त्यावेळी मंदिराच्या आवारात गुढी उभारली जाते. पालखीच्या वेळी बारा-पाचाच्या मानकऱ्यांच्या ‘वसंतपूजा’ केल्या जातात. मंदिरात ज्येष्ठ महिन्यात देसरूढ काढण्याचा विधी असतो तर श्रावण महिन्यात दररोज श्रावणीपूजा केली जाते. मंदिरातील सर्व स्थळांना गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, त्रिपुरी पौर्णिमा व देव दिपावलीत दिव्यांनी सजवले जाते. देवीचा शिमगोत्सवात साजरा केला जाणारा उत्सव धुळवडीपर्यंत चालतो. नवरात्रोत्सवामध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना होऊन रोज रात्री जागर करण्यात येतो.
देवीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे वार्षिक यात्रोत्सव होय. तो पौष पौर्णिमेस चालू होतो व पाच दिवस चालतो. यावेळी देवीचे गाभाय्रात जाऊन दर्शन घेता येते ईतर दिवशी फक्त पुजारीच गाभाय्रात जाऊ शकतात. जत्रेच्या कालावधीत दूरवरच्या गावातील भाविक देवीच्या दर्शनासाठी, नवस करण्यासाठी - फेडण्यासाठी आणि ओटी भरण्यासाठी तेथे येतात. त्यावेळी परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते. वार्षिक यात्रोत्सवात देवीची पूजा-अर्चा, दर्शन, ओट्या भरणे, नवस बोलणे व नवस फेडणे, सायंकाळी गोंधळी गायन, संगीत भजने, प्रवचन व पुराणवाचन, देवीची आरती, पालखी मिरवणूक आणि किर्तन असे कार्यक्रम आयोजित केले जातात. यात्रेच्या शेवटच्या रात्री ‘लळीता’च्या कार्यक्रमाने त्या शानदार सोहळ्याची सांगता केली जाते. मुंबईकर, माहेरवाशिणी बहुसंख्येने उपस्थित राहून देवीचे आशिर्वाद घेतात. त्या काळात गावात आनंदाचे वातावरण असते. मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजवला जातो. दूरवरच्या भाविकांची मंदिराच्या शेजारीच असलेल्या भक्तनिवासात राहण्याची सोय केली जाते. देवीचा डाळपस्वारीचा सोहळासुद्धा अविस्मरणीय असतो.
संकलन by - Dipesh Ghadigaonkar
https://youtube.com/@Suvarnkokanvlog
Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal
Mr. Ashish Natalkar, Devgad
Music:
Editing -: Mr. Ashish Natalkar
Location -:
Follow us on Facebook : https://www.facebook.com/Suvarn-Kokan...
Follow us on Instagram : https://www.instagram.com/
#kokan #traditionalkokan #pratha #rahasya #rahasyaekkhoj #rahasyafacts #suvarnkokanvlog