५० वर्षाहून अधिक काळ आपल्या दैदिप्यमान अभिनयाने केवळ मराठी रंगभूमीवरच नव्हे तर अखिल भारतीय कलाविश्वात अढळपद प्राप्त केलेले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नट विक्रम गोखले म्हणजे अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठच.
अभिनयाबद्दल स्वतंत्र विचार, देश-विदेशातील कलाशास्त्राचा गाढा अभ्यास, दुर्दम्य आत्मविश्वास, आणि अमर्याद ऊर्जा ह्या गुणांच्या बळावर नाटक आणि चित्रपट ह्या क्षेत्रांत अनेक विक्रमी आविष्कार त्यांनी केले. 'बॅरिस्टर', 'कमला', 'आणि मकरंद राजाध्यक्ष', 'नकळत सारे घडले', 'आप्पा आणि बाप्पा', 'कथा' सारखी गाजलेली नाटकं; आणि 'अनुमती', 'आघात', 'नटसम्राट', 'कळत नकळत', 'खरं सांगायचं तर', 'हम दिल दे चुके सनम', 'अग्निपथ' असे असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपट ह्यातील दर्जेदार अभिनयाने विक्रम सर जगभरातील रसिकांच्या मनातील ताईत आणि होतकरू कलाकारांचे आदर्श बनले आहेत. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा पुरस्कार, झी जीवन गौरव असे अगणित मानसन्मान त्यांना आजवर मिळालेले आहेत.
ह्या प्रदीर्घ प्रवासात आलेले अनुभव आणि ज्ञान स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचावं म्हणून सतत प्रयत्नशील असलेले विक्रम सर पुणे विद्यापीठात '"Science of dramaturgy" ह्या विषयाचे मानद प्राध्यापक म्हणून शिकवतात. याशिवाय स्वतःचे अभिनय आणि दिग्दर्शन वर्ग सुद्धा नेमाने चालवतात.
मराठी रंगभूमीवरचा हा महान नट आज उलगडतोय त्याचा नाट्यप्रवास, नाट्यप्रक्रिया आणि नाट्यविचार.